Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 July 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि. ****
· राज्यातल्या ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींसाठी येत्या १८ ऑगस्ट रोजी मतदान
· इंधन समायोजन आकार वसूल करण्यास वीज नियामक आयोगाची मंजुरी, विजेच्या दरात प्रतियुनिट सरासरी एक रुपयांची वाढ
· समृध्दी महामार्ग राज्याच्या विकासाचा साक्षीदार ठरेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
· मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका- धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ९४४ रुग्ण, मराठवाड्यात १९८ बाधित
· औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पंप हाऊस उभारणी संदर्भात २० ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्रीय पर्यावरण समितीला निर्देश
· राज्याच्या विविध भागातून निघालेल्या पालख्या - दिंड्या टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपुरात दाखल होण्यास प्रारंभ
आणि
· औरंगाबाद जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू
****
राज्यातल्या ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींसाठी येत्या १८ ऑगस्टला रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं काल न्यायालयाच्या आदेशानुसार कमी पावसाचं प्रमाण असलेल्या जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांतल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे. या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २० जुलैला निवडणूक कार्यक्रम जारी करायचा आहे. २२ जुलै ते २८ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. ही प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवली जाणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी panchayatelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. प्राप्त अर्जांची २९ जुलैला छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंत आहे. मतदान १८ ऑगस्टला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजे या वेळेत होईल. १९ ऑगस्टला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली आहे.
****
राज्यात विजेच्या दरात प्रतियुनिट सरासरी एक रुपया वाढ होणार आहे. वीज नियामक आयोगाने वीज कंपन्यांना वीज बिलातून इंधन समायोजन आकार वसूल करण्याबाबत मंजुरी दिली. यामुळे जून महिन्यापासून पुढचे पाच महिने म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत इंधन समायोजन आकार वीज ग्राहकांच्या वीज देयकात लागू होणार आहे. पहिल्या शंभर युनीट वापरासाठी प्रतियुनीट ६५ पैसे, एकशे एक ते तीनशे युनीटसाठी एक रुपया ४५ पैसे, तीनशे एक ते पाचशे युनीटसाठी दोन रुपये पाच पैसे, तर पाचशे एक युनीटच्या पुढील वीज वापरासाठी प्रति युनीट दोन रुपये ३५ पैसे दरवाढ होणार आहे. सध्या पहिल्या शंभर युनीटसाठी विजेचा दर तीन रुपये ३६ पैसे प्रतियुनीट असा असून, पाचशे युनीटपेक्षा अधिक वापरासाठी प्रतियुनीट ११ रुपये ८६ पैसे दर आकारला जातो आहे.
****
देशातल्या प्रमुख खाद्य तेल संघटनांनी खाद्य तेलाचे किरकोळ विक्री दर प्रति लिटर १५ रुपयांनी तात्काळ कमी करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. खाद्य तेलाच्या दरातली कपात सर्वत्र लागू व्हावी यासाठी तेल उत्पादक आणि शुद्धीकरण कंपन्यांनी वितरकांसाठीचे दर देखील तात्काळ कमी करण्याची सूचनाही केंद्र सरकारनं दिली आहे. खाद्य तेलाच्या दर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत त्वरित पोहोचायला हवा, तसंच ज्या कंपन्यांचे तेलाचे दर अन्य कंपन्यांपेक्षा जास्त आहेत, त्यांना देखील दर कपातीचे निर्देश देण्यात आल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत घेण्यात आलेल्या संकल्प ते सिध्दी -नवा भारत, नवे संकल्प या परिषदेत बोलत होते. समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरु करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह सीआयआयचे पदाधिकारी आणि उद्योजक या परिषदेला उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणात येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. इथेनॉलला पेट्रोलच्या समान पातळीवरील ऊर्जाउत्पादक मूल्याचे इंधन म्हणून प्रोत्साहन देणं आवश्यक असल्याचंही गडकरी म्हणाले. दिल्ली-मुंबई-बंगळुरू तसंच पुणे-औरंगाबाद हे महामार्ग करण्याचं नियोजन सुरु असून, राज्य शासनाने या महामार्गासाठी जमिन अधिग्रहणाचे काम तत्काळ सुरु करण्याची सूचना गडकरी यांनी केली.
फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुंबई ही फक्त महाराष्ट्राची नाही तर देशाची आर्थिक राजधानी असून २०३० पूर्वी महाराष्ट्राला ट्रिलीअन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचा सरकार स्थापन करण्याचा दावा मान्य करणं, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि बहुमताचा ठराव या बाबींना या गटानं आव्हान दिलं आहे. माजी मंत्री सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी ११ तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. यापूर्वीच्या याचिकांवरही याच दिवशी सुनावणी होणार असल्याचं न्यायमूर्ती इंद्रा बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं सांगितलं.
****
दरम्यान, कायदेशीर दृष्टया धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणीही शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मातोश्री निवासस्थानी काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधिमंडळ पक्ष आणि रस्त्यावरील पक्ष या दोन्ही स्वतंत्र बाबी असून आमदार बाहेर गेले तरी पक्ष तसाच राहतो असं ठाकरे म्हणाले.
****
विधान परिषदेवर निवडून आलेल्या १० सदस्यांनी काल सदस्यत्वाची शपथ घेतली. परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सर्वांना शपथ दिली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रवीण दरेकर, प्राध्यापक राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी आणि काँग्रेसचे भाई जगताप या सदस्यांचा समावेश आहे.
राज्यसभेच्या नवनिर्वाचित २७ खासदारांनाही काल शपथ देण्यात आली. यामध्ये वाणिज्य मंत्री पियुष गोयल, धनंजय महाडिक, आणि अनिल बोंडे या महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या खासदारांचा समावेश आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ९४४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ९८ हजार ६७३ झाली आहे. काल या संसर्गानं सात ��ुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ९७१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल तीन हजार ४९९ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ३१ हजार ८५१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९१ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १८ हजार ८५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १९८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ६९, जालना ४८, उस्मानाबाद ३९, लातूर २६, नांदेड ९ तर बीड जिल्ह्यात काल नव्या ७ रुग्णांची नोंद झाली.
****
औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जायकवाडी इथल्या पंप हाऊस उभारणी संदर्भात २० ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय पर्यावरण समितीला दिले आहेत. जायकवाडी परिसरात सुमारे दीड हेक्टर जागेवर हे पंपहाऊस नियोजित आहे. यासंदर्भात राज्यशासनाने १७ जूनला केंद्रीय पर्यावरण समितीकडे ऑनलाईन प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर पर्यावरण समितीच्या तीन महिन्यांनी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होईल, असं सांगण्यात आलं होतं. त्यावर काल न्यायालयानं, संबंधित परवानगीसाठी तीन महिने प्रतीक्षा करायला न लावता, २० ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या उमरीचे माजी नगराध्यक्ष विजयकुमार उत्तरवार सराफ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईला उद्या सोन्याचे मुकुट अर्पण करण्यात येणार आहेत. सुमारे दोन किलो सोन्याच्या या दोन्ही मुकुटांची एकत्रित किंमत एक कोटी तीन लाख रुपये आहे.
****
आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. राज्याच्या विविध भागातून निघालेल्या पालख्या दिंड्या पंढरपुरात दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. आषाढीनिमित्त उद्या पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पांडुरंगाची शासकीय महापूजा होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री आज रात्री पंढरपूर इथं येत आहेत. उद्या पहाटे अडीच ते साडे चार वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंग आणि रखुमाईची सपत्निक महापूजा होईल. पहाटे साडे पाच वाजता विठ्ठल मंदिर परिसरात इस्कॅान आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन तसंच पावणे सहा वाजता चंद्रभागा नदी घाटाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
****
बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी येत असल्यानं औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात येत आहे. काल गंगापूर, खुलताबाद आणि वैजापूर इथं पोलिस कर्मचाऱ्यांनी पथसंचलन करत बैठक घेतली. औरंगाबाद नजिक प्रतिपंढरपूर इथं उद्या प्राण्यांचा बळी न देण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.
****
आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्तानं औरंगाबाद, जालना आणि नांदेड या तीन प्रमुख स्थानकांवरून पंढरपूरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. प्रवाश्यांच्या गरजा लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने या तिन्ही गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढवली आहे. औरंगाबादहून रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी, जालना इथून सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी आणि नांदेडहून दुपारी ३ वाजता या विशेष रेल्वे गाड्या आज पंढरपूरसाठी निघणार आहेत.
****
येत्या १७ सप्टेंबरपासून हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर काल औरंगाबाद इथं स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, मराठवाडा विकास परिषद आणि इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्याचं महत्त्व मराठवाडा आणि मराठवाड्याबाहेर पोहोचवण्यासाठी या अमृत महोत्सवी वर्षात व्याख्यानं आणि परिसंवादांसह विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या लढ्याविषयी माहिती देण्यासाठी छोट्या पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या सभासद डॉ रश्मी बोरीकर यांनी दिली. त्या म्हणाल्या...
‘‘पहिली गोष्ट आहे शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांसाठी आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरूण वर्गासाठी म्हणून हैदराबाद मुक्ती संग्रामाची सर्व प्रकारांनी माहिती देणाऱ्या वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या पुस्तिका आम्ही प्रकाशित करणार आहोत. त्याच अनुषंगाने, वेगळ्यावेगळ्या जिल्ह्यांमध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या वर काही चर्चा घडवून आणता येणं आपल्याला शक्य आहे का किंवा शाळा आणि कॉलेजेसमध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामाविषयी काही स्पर्धा घेता येणं शक्य आहे का? याचाही अंदाज आम्ही यावर्षभराच्या ॲक्टीव्हीटीज्मध्ये आम्ही घेणार आहोत. आपण हा हैदराबाद मुक्ती संग्राम फक्त मराठवाड्यामध्ये नाही तर भारतभर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’
****
औरंगाबाद जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. गणेश थेटे, भारत वरकड, जगदीश मुरकुंडे, अर्जून मगर अशी या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. कन्नड तालुक्यातल्या हिवरखेडा नांदगीर वाडी इथं नवीन रोहित्र बसवण्याचं काम सुरू असताना, अज्ञात व्यक्तीने टाकलेल्या आकड्यामुळे, चालू असलेल्या कामाच्या तारेतून वीज प्रवाहित झाल्यानं, सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी महावितरण अभियंता, ठेकेदारासह पाच जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर काल मुंबईहून नांदेड शहरात परतले. यावेळी नांदेड रेल्वे स्थानकावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. रेल्वे स्टेशन ते मालेगाव रोड तरोडा खुर्द इथल्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
****
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात "रस्ता सुरक्षा मार्गदर्शन" शिबीराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत उपस्थित होते. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी वाहतुक नियमांचं पालन करण्याची आवश्यकता असल्याचं खुशालसिंह परदेशी यावेळी म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात पिण्याचं २२ टक्के पाणी दूषित असल्याचं आढळलं आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या तपासणीच्या निष्कर्षातून ही माहिती समोर आली. तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांपैकी आठ तालुक्यातील ९३३ पाण्याच्या नमुन्यात २०८ नमुने दुषित आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातल्या २३१ गावांना पिवळे कार्ड तर ३९१ गावांना हिरवे कार्ड देण्यात आलं आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३९ टक्के दुषित पाणी नमुने उस्मानाबाद तालुक्यात तर सर्वात कमी म्हणजे १४ टक्के दुषित पाणी नमुने हे कळंब तालुक्यात आढळून आले असून लोहारा तालुक्यात दुषित पाण्याचं प्रमाण शून्य टक्के आहे.
****
औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या विरोधात १२ जुलै मंगळवारी शहरात भव्य मूक मोर्चा निघणार आह��. औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक अयूब जागिरदार आणि गौतम खरात यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गौतम खरात यांनी याबाबत बोलताना, छत्रपती संभाजी महाराज यांचा आपण आदर करतो. पण औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचे पुण्यात जीवन व्यतीत झाले. त्यांची समाधी सुध्दा पुण्याजवळ असल्याने संभाजीनगर हे नाव पुणे शहराला देण्यात यावं अशी मागणी खरात यांनी केली.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज होणार आहे. सायंकाळी सात वाजता या सामन्याला सुरवात होईल.
परवा झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा ५० धावांनी पराभव करत, मालिकेत एक शून्यनं आघाडी घेतली आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसांत राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या काळात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
0 notes