Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 September 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
नारी शक्ती वंदन अधिनियम ही नव्या लोकशाही बांधिलकीची घोषणा-पंतप्रधानांचं प्रतिपादन.
शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत करावी-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी.
ज्येष्ठा गौरी पूजनाचा सण सर्वत्र उत्साह आणि श्रद्धापूर्वक साजरा.
आणि
मोहाली इथल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर २७७ धावांचं लक्ष्य.
****
‘नारी शक्ती वंदन अधिनियम अर्थात महिला आरक्षण विधेयक’ हा कोणताही सामान्य कायदा नसून, नव्या भारताच्या, नव्या लोकशाही बांधिलकीची घोषणा असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात नारी शक्ती वंदन-अभिनंदन कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. हे ऐतिहासिक विधेयक पूर्ण उत्साहात मंजूर केल्याबद्दल त्यांनी दोन्ही सभागृहांचे, सर्व राजकीय पक्षांचे आणि खासदारांचे आभार मानले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या मासिक कार्यक्रमाचा हा १०५ वा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरून हा कार्यक्रम प्रसारीत होईल. आकाशवाणीचं संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
भारतातले वैद्यकीय पदवीधर आता अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इतर देशांमध्ये पदव्युत्तर शिक्षण तसंच वैद्यकीय व्यवसाय करू शकणार आहेत. भारताच्या राष्ट्रीय चिकित्सा आयोगाला पुढच्या दहा वर्षांसाठी जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघ - वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्यूकेशन डब्ल्यू एफ एम ईची मान्यता मिळाली आहे. यामुळे देशभरातल्या सर्व ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांना डब्ल्यू एफ एम ईची मान्यता लागू झाली आहे. पुढच्या दहा वर्षांत देशभरात स्थापन होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांना देखील ही मान्यता मिळणार आहे.
****
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ करून ते एक हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते मंत्रालयात या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. महामंडळाचं भाग भांडवल सध्या ७०० कोटी रुपये आहे. शासनाने महामंडळाला तीस कोटी रुपयांची कर्ज हमी दिलेली आहे, त्यातही वाढ करुन ती टप्प्या-टप्प्याने पाचशे कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं. महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या संस्थांसंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळालाही लागू करण्याचा आणि न्यायालयाचा कोणताही अडसर नसलेल्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असं पवार यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांना पीकविम्याच्या नुकसान भरपाईसह प्रत्येकी २५ हजार रुपये मदत करण्याची मागणी विधान सभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कृषीमंत्र्याच्या बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून, कोणत्याही विषयावर सरकार गंभीर नसल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
****
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के पीक विमा अग्रीम मंजूर करून रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. आमदार क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत एक पत्र पाठवलं आहे. जिल्हाभरात पावसाच्या अनियमिततेमुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालं असल्याने, सर्व शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी आर्थिक मदत करणं आवश्यक असल्याचं, या पत्रात म्हटलं आहे.
****
गणेशोत्सवाच्या पर्वात ज्येष्ठा गौरी पूजनाचा सोहळा आज घरोघरी साजरा केला जात आहे. काल विराजमान झालेल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरींची मनोभावे पूजा करून, त्यांना आणि त्यांच्या बाळांना आज षड्रस भोजनासह फराळाच्या विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला. अनेक घरांमध्ये सध्या सायंकाळच्या सुमारास हा पूजन सोहळा सुरू आहे. उद्या या गौरींचं विसर्जन होणार आहे.
****
धाराशिव शहरातील एकता फाउंडेशन गणेशोत्सव मंडळांने यंदा रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पर्जन्य जलपुनर्भरण करणारा देखावा तयार केला आहे. धाराशिव जिल्ह्यात दर दोन-तीन वर्षांनी उद्भवणारा दुष्काळ आणि पाणीटंचाईसारख्या समस्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जलपुनर्भरणाला प्राधान्य द्यावं हा संदेश या देखाव्यातून मंडळाने दिल्याचं, मंडळाचे अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी सांगितलं. ते म्हणाले....
आपण पाहत आहोत की, गेल्या काही महिन्यापासून पाऊस काळ हा अत्यंत कमी पडलेला आहे. त्याच्यामुळे पाण्याची बचत ही कशी होईल व प्रत्येक पाण्याच्या थेंबाचं संकलन कशा प्रकारे होईल यासाठी आम्ही रेन हार्वेस्टींग या देखाव्याद्वारे सर्व जनतेला आवाहन करत आहोत की, आपण रेन हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट आपल्या प्रत्येक घरावर राबवावेत, प्रत्येक पाण्याचा थेंब हा आपण वापरावा.
बीड शहरातल्या बीड चा राजा न्यू गणेश मित्र मंडळाने यंदा उत्तराखंड इथल्या केदारनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे. सुमारे १० हजार चौरसफूट जागेवर उभारलेल्या या भव्य देखाव्याचं उद्या सायंकाळी उद्घाटन होणार आहे.
****
मोहाली इथं सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २७७ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केलं, ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत दहा बाद २७६ धावा केल्या. भारताच्या मोहम्मद शमीने सर्वाधिक पाच बळी घेतले.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या होंगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत साथियान ज्ञानसेकरन, अचंता शरथ कमल आणि हरमीत देसाई यांच्या भारतीय पुरुष टेबल टेनिस संघानं आज येमेनचा ३-० ने सहज पराभव केला. या स्पर्धेत आज भारतीय महिला टेबल टेनिस संघाचा सामना सिंगापूरच्या संघाशी होणार आहे.
****
सर्बियाच्या बेलग्रेड इथं सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत भारताची युवा पहेलवान अंतिम पंघालनं ५३ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. या कामगिरीद्वारे तिनं भारतासाठी २०२४ पॅरिस ऑलिंपिकसाठीची पात्रताही मिळवली आहे.
****
पुढील महिन्यात उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या, अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स एशियन स्पर्धेसाठी, भारताच्या संघात, एकूण ४६ जिम्नॅस्ट सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथं येत्या १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
****
हिंगोली इथं सुशिक्षित बेरोजगार कृती समितीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाळून या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला.
****
चंद्रपूर मध्ये ताडाळा गावात, वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सूर्यभान टिकले असं मृत शेतकऱ्याचं नाव असून, ते आज सकाळी शेतात कामासाठी गेले असता, वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी वनविभागाकडून पुढील खबरदारी घेतली जात आहे.
****
अहमदनगर इथं केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह तसंच आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त मल्टिमिडिया चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड तसंच अहमदनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनात पौष्टिक तृणधान्यांच्या ��ाहितीसह, या धान्यपासून बनवण्यात आलेले पदार्थ, त्यांचे आहारातले महत्त्व याची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून एलईडी टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आली आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य आहे.
****
नवी मुंबईत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज अंगणवाड्यांमध्ये पालक सभा घेण्यात आली. मुलांसाठी कोणता आहार योग्य आहे, याबाबत या पालक सभेत पालकांना माहिती देण्यात आली. तसंच योग्य आहाराच्या सवयी, वैयक्तिक तसंच परिसर स्वच्छता, आणि पाणी बचत याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या एकूण २०६ जलप्रकल्पांमध्ये फक्त १० टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सर्व प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याच्या वापराकरीता आरक्षित करण्याचे निर्देश दिले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर परिसरात आजही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६ पूर्णांक ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
****
0 notes