Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 13 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आमदारकी तसंच काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारवर टीकास्त्र
धाराशिव इथं पाचशे खाटांच्या अद्ययावत रुग्णालयसाठीची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
समृध्दी महामार्गावर जालना हद्दीत रुग्णवाहिकेचा अपघात; दोन जणांचा मृत्यू
आणि
नांदेड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप
****
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा तसंच काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचं पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवलं आहे. राजीनामा देणं हा वैयक्तिक निर्णय असून, काही अन्य पर्याय पहावेत असं वाटल्यानं आपण राजीनामा दिला, असा खुलासा चव्हाण यांनी केला. येत्या दोन दिवसात पुढची राजकीय भूमिका जाहीर करू, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं...
अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिलंय हे निश्चितच बरोबर आहे, पण अशोक चव्हाणांनी सुद्धा पक्षाकरीता खूप केलं ह्या दोन्ही गोष्टी बरोबरीने आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण हे जिथे राहिले तिथे प्रामाणिकपणे राहिले हे मला मुद्दाम सांगावसं वाटतंय. पक्षाने मला मोठं केलं, तर मी सुद्धा पक्षासाठी काही कधी कमी केलं नाही असं मी मुद्दाम सांगतो. कोण काय करेल हे मला माहित नाही. पण ही माझी भूमिका आहे की कोणत्याही आमदाराला संपर्क केला नाही.
****
दरम्यान, सर्व काही मिळालेले नेते काँग्रेस पक्ष आणि विचारधारेला सोडून जात आहेत, हे दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत बोलतांना, बुधवारी आणि गुरुवारी मुंबईत काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असल्याची माहिती दिली.
दरम्यान, अशोक चव्हाण यांना राज्यसभा उमेदवारी देण्याचा या क्षणी कोणताही प्रस्ताव नसल्याचं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. भाजपकडे राज्यसभेच्या तीन जागा जिंकण्याचं बहुमत आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक-एक जागा मिळेल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, काँग्रेस पक्ष सोडल्याबद्दल अशोक चव्हाण यांचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनंदन केलं आहे. त्यांना महायुतीसह रिपब्लिकन पक्षात प्रवेशाचं आमंत्रण त्यांनी दिलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद अभियानांतर्गत काल छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, कन्नड इथं जनतेशी संवाद साधला. आताचं सरकार हे जनतेची फसवणूक करणारं सरकार असल्याची टीका ठाकरे यांनी केली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती, त्यातला किती निधी मराठवाड्यासाठी देण्यात आला, हे श्वेतपत्रिका काढून सरकारने जाहीर करावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
****
धाराशिव जिल्ह्यात पाचशे ��ाटांचं अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये अद्ययावत सुधारणा करण्यासाठी, आशियाई विकास बँकेनं चार हजार कोटी रूपये मंजूर केले असून, पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अद्ययावत आणि दर्जेदार जिल्हा रुग्णालयं उभारण्यासाठी हा निधी खर्च करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
राज्यातल्या ४० दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सोळाशे कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. राज्यातल्या ३२ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. या दुष्काळी तालुक्यांमधल्या बाधित क्षेत्राचे अहवाल तातडीनं शासनाला सादर करावेत, असे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.
****
जात प्रमाणपत्र पडताळणी अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदवण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना पत्राद्वारे केली आहे. या मसुद्यावर हरकत नोंदवण्यासाठी १६ फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे.
****
ग्रामीण भागापर्यंत विश्वकर्मा योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुकाणू अधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. नवी मुंबईत बेलापूर ते विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते.
****
केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नव्याने भरती झालेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. नागपूर इथं हिंगण्याच्या केंद्रीय राखीव पोलीस बल - सीआरपीएफ ग्रुप सेंटर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमात ११९ जणांना नियुक्ती पत्रं प्रदान करण्यात आली.
****
संचमान्यता सुधारित करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं तातडीने भरण्यात येतील, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळच्या शिष्टमंडळाने काल केसरकर यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत देखील शासन सकारात्मक असल्याचं ते म्हणाले.
****
नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावरील जालना हद्दीतल्या जामवाडी शिवारात काल पहाटे एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात दोनजण ठार, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिका मुंबईतल्या सायन रुग्णालयातून एक मृतदेह घेऊन उत्तर प्रदेशकडे जात असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. समृद्धी महामार्गावर आठवडाभरातला ��ा तिसरा अपघात आहे.
****
हिंगोली शहराजवळ लिंबाळा मक्ता भागात, भारतीय कापूस महामंडळ - सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र कालपासून सुरू झालं. पहिल्याच दिवशी या केंद्रावर ३५७ क्विंटल ४० किलो कापसाची आवक झाली, तसंच सहा हजार ९२० रुपये दरानं कापसाची खरेदी करण्यात आली.
****
नांदेड शहरात काल विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप झाला. यावेळी नागरिकांनी आयुष्यमान कार्ड तसंच पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेतला, आणि आरोग्य तपासणी शिबिरातही सहभाग नोंदवला. यावेळी मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांचे लाभ मिळालेल्या वंदना पंडित, सोनाली सोनकांबळे या लाभार्थींनी आपलं मनोगत व्यक्त के��ं.
****
लातूर इथं राज्य पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महासंस्कृती महोत्सव, तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय शंभराव्या नाट्यसंमेलनाला कालपासून सुरूवात झाली. यावेळी गंजगोलाई परिसरात काढण्यात आलेल्या नाट्यदिंडीत पारंपारिक वेशभूषेतल्या लोककलावंतांनी ढोल-ताशाच्या गजरात विविध कलांचं सादरीकरण केलं. हे संमेलन १५ तारखेपर्यंत चालणार आहे.
दरम्यान, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं आज उद्घाटन होणार आहे.
****
जालना इथंही आजपासून महासंस्कृती महोत्सव सुरु होत असून, यानिमित्त काल संध्याकाळी शहरातल्या मामा चौकातून महासंस्कृती दिंडी काढण्यात आली. या दिंडीत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महासंस्कृती महोत्सवाचं उद्घाटन आज संध्याकाळी होणार आहे.
****
नांदेड इथं १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. विविध क्रीडा स्पर्धांसह, लोककला, लोक संगीत, लोकनृत्यांचं सादरीकरण यावेळी करण्यात येईल. बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन यावेळी भरवण्यात येणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार आज प्रसिद्ध लेखक रा.रं.बोराडे यांना प्रदान केला जाणार आहे. बोराडे यांच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठालेपाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
****
धाराशिव तालुक्यातल्या ११० पारधी आदिवासी भूमिहीन शेतमजूरांना हक्काची शेतजमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी तालुक्यातल्या ६३ शेतकऱ्यांची ६८ हेक्टर शेतजमीन खरेदी केली जाणार आहे. यामध्ये जिरायती शेती पाच लाख रुपये प्रती एकर दराने तर बागायती शेती आठ लाख रुपये प्रती एकर दराने खरेदी करण्यात येणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात जल जीवन अभियानांतर्गत संथ गतीनं सुरू असलेल्या १६८ पाणी योजनांच्या कामांवरील कंत्राटदारांना ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याशिवाय सुरू न झालेल्या २० पेक्षा अधिक योजनांच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
****
बीड जिल्ह्यात मल्टीस्टेट बँका ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी, सर्व ठेवीदारांना सोबत घेऊन बीडच्या जिल्हा कचेरीवर काल मोर्चा काढला. यामध्ये ठेवीदारांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
****
0 notes
अरविंद केजरीवाल यांनी भाजपला "सरकारांचा सिरीयल किलर" म्हटले आहे, विश्वासाचे मत हवे आहे
अरविंद केजरीवाल यांनी भाजपला “सरकारांचा सिरीयल किलर” म्हटले आहे, विश्वासाचे मत हवे आहे
अरविंद केजरीवाल यांनी भाजपकडे आमदार खरेदी करण्यासाठी इतका पैसा कसा काय असा सवाल केला.
नवी दिल्ली:
अरविंद केजरीवाल यांनी आज भाजपला “सरकारांचा सिरीयल किलर” संबोधले आणि आम आदमी पक्षाच्या (आप) एकाही आमदाराला आमिष दाखवण्यात पक्ष अपयशी ठरला आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना विश्वासदर्शक ठरावाचा सामना करायचा आहे.
आप सरकार सोमवारी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे…
View On WordPress
0 notes