Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 September 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
Date – 09 September 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दहा दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता;लाडक्या गणरायाला राज्यभरात वाजतगाजत निरोप
हिंगोली इथल्या चिंतामणी गणपतीच्या मोदकोत्सवाला भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत
आणि
जायकवाडी धरणाच्या पाणी विसर्गात वाढ;गोदाकाठावरील नागरिकांना खबरदारीचा इशारा
****
गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. दहा दिवस मनोभावे पूजन केलेल्या गणरायाला आज सकाळपासून वाजतगाजत निरोप दिला जात आहे. कोविड प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष असलेल्या प्रतिबंधानंतर यंदा कोविडमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला, आज अनंत चतुर्दशीला राज्यभरात विसर्जन मिरवणुकांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पुण्यात मानाच्या पाच गणपतींना निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली.
मुंबईत लालबागच्या राजासह अनेक मोठ्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांमुळे मुंबईतले रस्ते फुलून गेले आहेत.चोख पोलिस बंदोबस्तात सर्वत्र विसर्जन मिरवणुका सुरू आहेत.
औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला. पारंपरिक पद्धतीनं ढोलताशाच्या गजरात निघालेल्या या विसर्जन मिरवणुकीत लोकप्रतिनिधींसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. महानगरपालिकेच्या वतीनं शहरात आठ विसर्जन विहिरी आणि दोन कृत्रीम तलावांवर गणेश विसर्जन व्यवस्था करण्यात आली. शिवाय शहरात विविध ठिकाणी गणेशमूर्ती संकलन व्यवस्था करण्यात आली आहे.
जालना शहरात मोतीतलाव चौपाटीवर सकाळपासून घरगुती गणपतीसह मंडळाकडून गणेश विसर्जन केलं जात आहे. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी आवश्यक नियोजन करण्यात आल आहे.
****
हिंगोली इथला चिंतामणी गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी मोदकोत्सव घेण्यात येतो. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर...
कोरोनामुळे दोन वर्ष मोदकोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. यंदा निर्बंध शिथिल झाल्यामुळे हा उत्सव अनंत चतुर्दशीला पहाटेपासूनच उत्साहात सुरु झाला आहे. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या. तीन लाख भाविकांना नवसाचे मोदक वाटप करण्याची तयारी मंदिर प्रशासनाने केली आहे. दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर संस्थान, पोलीस, नगर पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
****
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपिठापैकी अर्धे स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या सप्तशृंगी देवीच्या मूर्ती संवर्धनाचं काम पूर्ण झालं आहे. कालपासून मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे. संवर्धनादरम्यान मूर्तीवरील दोन हजार किलो शेंदुराचा कवच काढण्यात आला असून त्यामुळे देवी मूळ स्वरूपात दिसू लागली आहे. देवीच्या आयुधांमध्येही बदल पाहायला मिळत आहे. गेल्या ४५ दिवसांपासून भाविकांसाठी बंद असलेलं हे मंदिर घटस्थापनेपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. देवस्थानचे विश्वस्त विधीज्ञ ललित निकम यांनी ही माहिती दिली.
****
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दरानं वितरीत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठीचा हा मदत निधी संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीनं जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
****
देशांतर्गत उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशानं केंद्रानं तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. हा निर्णय आजपासून लागू झाला आहे. परकीय व्यापार धोरण २०१५-२०२० अंतर्गत परिवर्तनीय व्यवस्थेच्या तरतुदी या अधिसूचनेला लागू होणार नाहीत. देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी सरकारनं सेला तांदूळ वगळता बिगर बासमती तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लागू केलं आहे. महसूल विभागाच्या अधिसूचनेनुसार धान किंवा कच्च्या आणि तपकिरी तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आलं आहे. बासमती आणि पॉलिश तांदूळ यांच्या निर्यातीवरही २० टक्के सीमा शुल्क आकारलं जाईल.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ९ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळं आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१४ कोटी ५९ लाखांच्या वर गेली आहे. आतापर्यंत १७ कोटी ६१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची मात्रा घेतली. राज्यात आज सकाळपासून ९ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ६३ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ८६ लाख २३ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
****
बाल हुतात्मा दिनानिमित्त आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी नंदूरबाद इथं हुतात्मा स्मारकावर जावून अभिवादन केलं. नंदुरबारचे बाल हुतात्मा शिरीष कुमार मेहता यांच्यासह त्यांच्या पाच साथीदारांनी चलेजाव चळवळीनं प्रेरित होवून ०९ सप्टेंबर १९४२ रोजी गांधींजींच्या जुलमी इंग्रजी राजवटी विरोधात एल्गार पुकारला होता. त्यावेळी इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात शिरीष कुमार मेहता आणि त्याच्या साथीदारांना हौतात्म आलं होतं.
****
लम्पी या चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील पशुधनाचं शंभर टक्के लसीकरण करण्यात येणार असल्याचं, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या चर्मरोगाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मकतेनं कार्यवाही करावी, अशा सूचना विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.
****
जालना शहरात विक्रीसाठी येणारा ६३ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकाने रोहनवाडी रोडवर केलेल्या या संयुक्त कारवाईत पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून गांजा आणि कार असा एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे सध्या तीन फुटावर स्थिर करण्यात आले असून ५६ हजार ५९२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, औरंगाबाद तसंच जालना शहर परिसरात आज दिवसभरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
****
नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर परिसरात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने नाशिक शहरातही विजेचा धक्का लागून एका युवकाचा मृत्यू झाला, तर पावसाने एक घर कोसळून दोन जण ठार झाले.
****
भारतीय हवामान विभागानं अहमदनगर जिल्ह्यात आजपासून परवा ११ सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, घोडनदी, मुळा आणि प्रवरा या नद्यांमध्ये अतिवृष्टी तसंच धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळं मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
****
0 notes